सोनई : येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने परिसरातील दहा माध्यमिक विद्यालयातील व दोन उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ व पालकांतून या विशेष उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आनंदवन ध्यानमंदीरात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी प्रास्ताविक भाषणात संस्था राबवित असलेल्या धार्मिक,शैक्षणिक,आरोग्य व पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती दिली. प्रा. दत्ता हापसे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक निर्णय विषयी मार्गदर्शन केले. प्रा. हापसे, मुळा कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक डाॅ. ज्ञानेश्वर दरंदले व चंद्रकांत टेमक यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष उदय पालवे, किशोर घावटे, शहाराम तांदळे, अॅड सुनिल गडाख यांनी केला. पालक बाबासाहेब कवडे,डाॅ. योगेश वाघ, डाॅ. संतोष गुरसळ, शिक्षक जालिंदर टेमक यांचे भाषण झाले. ताईसाहेब कन्या विद्यालय, मुळा पब्लिक स्कुल, यश अकॅडेमी, शनिश्वर विद्यालय, किड्स किंग्डम, आदर्श विद्यालय, लोट्स स्कुल, शिव चिदंबरम विद्यालय, डाॅ.आंबेडकर विद्यालय व सुजाता स्कूलमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. संदीप तांबे यांनी स्वागत केले. अरुण घावटे यांनी सुत्रसंचालन केले. संजय गर्जे यांनी आभार मानले.
————————————











