गणेश हापसे गणराज्य न्यूज नागपूर : राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ६ हजार रुपये देत असून, लवकरच हे अर्थसाहाय्य ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या हप्त्याचे वितरण झाले. त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीत झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना थेट ६ हजार रुपये सन्मान निधी देते. राज्य शासन ‘नमो किसान सन्मान निधी’द्वारे वर्षाकाठी ६ हजार रुपये देते. राज्य शासन यात ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याचे ९ हजार आणि केंद्राचे ६ हजार असे आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे.