राहुरी : ब्राह्मणी परिसरात मागील चार दिवसांपासून जिओ मोबाईल नेटवर्कची रेंज अचानक गायब झाल्याने मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कॉल न लागणे, कॉलमध्ये वारंवार व्यत्यय येणे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे thpp होणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिओची सेवा विस्कळीत असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणारे ऑनलाइन व्यवहार, बँकिंग, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तसेच अत्यावश्यक फोन कॉल यावरही याचा परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे नेटवर्कच्या समस्येबाबत ग्राहकांकडून वारंवार प्रयत्न करूनही समाधानकारक सेवा पूर्ववत होत नसल्याने जिओ कंपनीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चार दिवसांपासून नेटवर्क गायब असताना कंपनीकडून तातडीने दखल का घेतली जात नाही? असा संतप्त सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोबाईल नेटवर्क ही आता केवळ सुविधा नसून दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने तातडीने तांत्रिक बिघाड दूर करून ब्राह्मणी परिसरातील जिओ सेवा सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
चार दिवसांपासून रेंज नाही, ग्राहक मात्र रिचार्जचे पैसे नियमित भरत आहेत; मग सेवा सुरळीत करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल करत नागरिकांनी कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे













