गणराज्य न्यूज राहुरी – १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणीचा २७ जून रोजी. दुपारच्या सुमारास नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी विद्यापीठ जवळ दुचाकीवर जात असताना कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाली.
सुचिता आधाटे (वय २८ वर्षे, रा. पुणे) असे मयत नवविवाहितेचे नाव आहे. ती कृषी विस्तार विभागात पीएचडी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती. ८ जून २०२५ रोजी या तरुणीचा विवाह झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. लग्नानंतर ती पुन्हा विद्यापीठ येथे येऊन होस्टेलवर राहून पुढील शिक्षण घेत होती.
काल २७ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता सुचिता आधाटे ही विद्यार्थीनी तिच्या एमएच-१४ एलएन २८०९ क्रमांकाच्या दुचाकीवर विद्यापीठ येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होती. त्यावेळी नगरकडून राहुरीकडे येत असलेल्या टिएन-५९ डिएक्स ३१५७ क्रमांकाच्या कंटेनरने सुचिता आधाटेच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी डी. एन. जाधव, जयेश पवार, अमोल दिवे, गणेश पर्वत, अनिल नजन, रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार, वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता तिला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. राहुरी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने व चालकाला ताब्यात घेतले आहे.












