राहुरी – तालुक्यातील ब्राम्हणीसह परिसरातील गावात सध्या विजेचा खेळ खंडोबा सुरू असून शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आला आहे .
महावितरण विभागाने यासाठी व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देवून व्यवस्थित वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. लोड शेडिंग असेल तर आठवड्यात किती दिवस कोणत्या भागातील विद्युत रोहित पूर्ण क्षमतेने चालू राहील.हे जाहीर करावं. जेणेकरून शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था किंवा अन्य मार्गाचा अवलंब करता येईल.. व शेतातील सोन्यासारखी पिके जगवता येईल.
शेतातील पिके टिकविण्यासाठी शेतकरी धडपड करत असताना लाईट त्यास साथ देईना.त्यामुळे पिके धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.मोटार चालू केल्यावर सदर पिकापर्यंत पाणी जाण्यापूर्वीच लाईट जाते.पुन्हा येते..अन् लगेच जाते.याच कामी शेतकरी मोटरीच्या खोक्यापर्यंत जावून येवून दिवसभर हैरान होतो.याशिवाय भरण पण होत नाही.
जिवावर उदार होऊन रात्रीचं पाणी
काही भागांत आठवडाभर रात्री व आठवडाभर दिवसा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. दिवसा होणारा वीजपुरवठा टिकतच नाही. काही ठिकाणी सिंगल फेजही वीजपुरवठा टिकत नसल्याची स्थिती आहे.
त्यामुळे आज द्यावयाचे पाणी किमान आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळाने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. रात्री मिळणारी वीज बरी टिकते..मात्र,जिवाचा धोका पत्करून आपले शेत भीजविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.यापूर्वी (बिबट्या हल्ला) अशा अनेक घटना घडलेल्या असतानाही शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी काही पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.